“गाढवाची हजामत”

गाढवाची हजामत

 

“गाढवाची हजामत”

दिल्ली शहरात एक न्हावी आपल्या बोलण्यात लोकांना अडकवून फसवत असे. त्याच्या या चहाटळ व लबाड स्वभावामुळे सर्वजण त्याचेपासून दूर राहात. एकदा एक लाकूडतोडया डोक्यावर मोळी व मोळीवर कु-हाड ठेवून रस्त्याने जात होता. न्हाव्याने त्याला हाक मारली व विचारले, ‘ए मोळीवाल्या, तुझ्या डोक्यावरच्या सर्व लाकडाची काय किंमत आहे?’

लाकडतोडया म्हणाला, ‘मी आठ आणे घेईन.’ न्हावी कुचेष्टेने हसून म्हणाला, ‘अरे काय तुझ्यासकट किंमत सांगतोयस काय? ला फक्त तुझ्या डोक्यावरच्या लाकडांची किंमत सांग.’ लाकूडतोड्या न रागावता म्हणाला, ‘सहा आणे द्या’ न्हाव्याने बरीच धासाधीस करुन चारच आणे द्यायचे कबूल केले. लाकूडतोड्याने मोळी न्हाव्याच्या अंगणात टाकून चार आणे मागितले.

न्हावी म्हणाला, ‘हे काय, तुझ्या डोक्यावरची सर्व लाकडे तू दिलीच नाहीस व पैसे मागतो?’ लाकूडतोडयाने गयावया करत सर्व लाकडे दिली असे सांगून पुन्हा पैशाची मागणी केली. न्हावी म्हणाला, ‘तुझ्या या कु-हाडीचा दांडासुध्दा लाकडाचाच आहे व तोसुध्दा द्यायला हवास.’

लाकूडतोड्या म्हणाला, ‘मालक, तुम्हाला कु-हाडीचा दांडा दिला तर मी लाकडे कशी काय तोडू? उद्या माझे पोट कसे भरणार?’

न्हाव्याने बळजबरीने कु-हाडीचा दांडा काढून घेतला व चार आणे देऊन अशीच बोली ठरली होती म्हणून ओरडून सांगितले.

बिचारा गरीब लाकुडतोडया हतबुद्ध झाला. त्याने बिरबलाकडे जाऊन तक्रार केली. बिरबल हसला. लाकूडतोडयाला तो म्हणाला, ‘काही चिंता करू नको. तुझा कु-हाडीचा दांडाही तो परत करेल व जन्मभर खजिल होईल अशी त्याची फजितीही करतो. बिरबलने न्हाव्याला एक युक्ति सांगितली व परत पाठवले. दोन चार दिवसांनी लाकूडतोड्या सकाळीच न्हाव्याच्या दरवाज्यात जाऊन उभा राहिला. तो न्हाव्याला म्हणाला, आज संध्याकाळीच माझे लग्न आहे. तेव्हा माझी व माझ्या मित्राची गुळगुळीत दाढी व हजामत करून द्या. तुम्ही म्हणाल तेवढे पैसे मी जरुर देईन.’न्हाव्याला वाटले, बरे झाले. चांगला अडकला बोलण्यात, मी म्हणेन तेवढे पैसे द्यायला कबूल झाला आहे. हजामती झाल्या की चांगली मोठी रक्कम वसूल करतो तो लाकूडतोड्याला म्हणाला, ‘ठीक आहे. मी तुझी व तुझ्या मित्राची हजामत करतो पण तू मी मागेन तेवढे पैसे द्यायचे कबूल केले आहेस हे मात्र विसरू नको.’ न्हाव्याने लाकूडतोडयाला समोर बसवले. त्याची दाढी व हजामत केली. नंतर म्हणाला, ‘कुठे आहे तुझा मित्र? लवकर बोलाव.’ लाकूडतोडयाने बाहेर जाऊन कान धरुन आपले गाढव आणले व म्हणाला, ‘हाच माझा मित्र, कर याची हजामत’ न्हावी संतापला. दोघांचे भांडण झाल्यावर ते दोघे बिरबलाकडे आले. बिरबल म्हणाला, ‘जर बोली ठरल्याप्रमाणे तू कुन्हाडीचा दांडासुध्दा घेतो तर बोली टाकतो.’ ठरल्याप्रमाणे तुला आता गाढवाची हजामत करायला हवी. नाहीतर मी तुला तुरुंगात टाकीन. न्हाव्याचा नाईलाज झाला व शेवटी त्याने मान खाली घालून गाढवाची हजामत केली. ते पहायला प्रचंड गर्दी गोळा झाली व सर्वजण पोट धरून हसू लागले. हजामत आटोपल्यावर लाकूडतोडयाने त्याला म्हटले, ‘आता बोलीप्रमाणे तू खुशाल हवे तेवढे पैसे माग.’

समोर बिरबल आणि खूप लोक हसत उभे होतेच. ते पाहून न्हावी म्हणाला, ‘नको, माझी चूक झाली. त्याची मला शिक्षा झाली. मला तुझ्याकडून पैसे नको’ असे म्हणून आपली घोपटी उचलून तो घाईघाईने तेथून पसार झाला.
➖➖➖➖➖➖➖
संकलन
प्रा. माधव सावळे