तुरवड्याचा श्रीजनार्दन
गर्द झाडीतील सर्वांगसुंदर विष्णूमूर्ती !!
तुरवडे, आडे, रत्नागिरी
संकलन – सुधीर लिमये पेण
कोकण म्हणजे खरोखर अलिबाबाची गुहा आहे. वर्षानुवर्षे इथे हिंडत राहिलं तरी सगळं कोकण बघितलं अस तर होत नाहीच, पण एकेक नवनवीन ठिकाणं, मूर्ती आपल्याला सापडायला लागतात. अनेकदा त्या परिसरात हिंडून पण इथे हा देव वसला आहे हे कधीच लक्षात आलेलं नसतं. त्याला वेळ यावी लागते हेच खरं. नंतर आपणच आपल्याला वेड्यात काढायचं की इतक्या वेळा या परिसरात हिंडूनही हे ठिकाण कधीच कसं समजलं नाही. तुरवडे आणि तिथला सर्वांगसुंदर विष्णू हे असंच एक ठिकाण. हे गाव कुणी सांगितलं नाही तर लक्षात सुद्धा येणार नाही. आणि त्याहीपेक्षा कुणी बरोबर नसेल तर इथे येणंसुद्धा मुश्कील आहे. आडबाजूला, आडवाटेला हे शब्द कितीतरी सोपे असतील इतक्या अनगड ठिकाणी हा देव वसला आहे.
तुरवडे इथल्या विष्णूमूर्तीबद्दल प्र. के. घाणेकर सरांकडून ऐकलं होतं आणि तेव्हापासून हे ठिकाण डोक्यात होतं. इथे येण्याचा योग आला तो चिपळूणच्या श्री. धनंजय चितळेंमुळे. त्यांनी आडे इथल्या श्री बेहेरे या त्यांच्या आतेभावाचा संदर्भ दिला आणि श्री. बेहेरे आणि त्यांचा मुलगा नचिकेत यांच्यामुळे तुरवडे इथे जायचे नक्की झाले. नचिकेत आनंदाने सोबत यायला तयार झाला. तुरवडे हे आड्यापासून जवळच असलेलं गाव. तुरवडे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. याच्या चारही बाजूंनी उंच डोंगर आहेत. इथे आल्यावर रत्नागिरीजवळील जांभरूण गावी आल्यासारखे वाटले. रस्तासुद्धा अगदी अरुंद आणि तीव्र उताराचा. एकेठिकाणी डावीकडे दगडी पाखाडी दिसते. तिथे पाखाडीने उतरायला लागायचे. पाखाडी हा कोकणातला अतिशय सुंदर प्रकार आहे. दगडी पायऱ्यांची केलेली ही नागमोडी वाट आपल्याला खाली घेऊन जाते. पाखाडी उतरताना आजूबाजूला गर्द झाडी आहे. नारळ, पोफळी, रायवळ आंबे आणि इतर जंगली झाडांची कायम सोबत असते. पाखाडी संपते तिथे दोन घरं आहेत. तिथून समोर गेले की नदीपात्र ओलांडल्यावर झाडीत लपलेली दोन देवळे दिसतात. उन्हाळ्यात नदीला पाणी नाही अन्यथा पाण्यातून जावे लागते.
मंदिर प्राकार अगदी छोटा. चार पायऱ्या चढून गेल्यावर आपण सभामंडपात येतो. सभामंडपावर छप्पर नाही. समोरच गाभारा. आत गेलं की स्वर्गीय सौंदर्य आपल्यासमोर उभं दिसतं. अप्रतिम, देखणी प्रसन्नवदना विष्णूमूर्ती. देवाची पूजा झालेली. सर्वांगावर फुलांचा अभिषेक झालेला दिसतो. कोकणात विष्णूमूर्ती खूप संख्येने आहेत. आणि प्रत्येकीचे एक निराळे वैशिष्ट्य आहे. इथे देवाच्या हातात पद्म. चक्र, शंख आणि गदा अशी आयुधे. मूर्तीशास्त्रानुसार ही मूर्ती जनार्दनविष्णूची. कोकणात केशवविष्णूच सर्वत्र दिसत असताना इथे हा श्रीजनार्दन बघून खूप वेगळं वाटतं. मूर्ती घडवताना शिल्पकाराने अगदी सढळ हाताने दागिने कोरले आहेत. डोक्यावर मुकुट, त्याच्याखाली मण्यांची माळ, गळ्यात एकावली, फलकहार, स्कंदपत्र, दंडामध्ये वाकी आणि त्यात केयूरमणी, गळ्यात यज्ञोपवीत आणि वैकक्षक, शिवाय उरोबंध, कानात मकरकुंडले, कमरेला तीन थर असलेली मेखला, त्याच्या मधोमध मारलेल्या गाठीवर कीर्तिमुख, घोट्यापाशी तोडे, पायात पादांगद, हाताच्या दहाही बोटात अंगठ्या. दागिने मोजून दमायला होते. लक्ष्मीचा पती आहे तो, त्यामुळे असा नखशिखांत दागिन्याने मढलेला असेल तर त्यात नवल ते काय.
देव इथे समचरण स्थितीत उभे आहेत. देवाच्या मागे असलेल्या प्रभावळीत दशावतार कोरले आहेत. यातल्या आठवा अवतार कृष्णाचा नसून बलराम दाखवला आहे. कसबा संगमेश्वर इथल्या कर्णेश्वर देवळात कोरलेल्या दशावतारातसुद्धा बलराम दिसतो. देवाच्या उजवीकडे ब्रह्मदेव तर डावीकडे महादेव कोरलेले आहेत. पण इथल्या मूर्तीचं खास वैशिष्ट्य त्याच्या पायाजवळ आहे. उजव्या पायाशी हात जोडून उभा असलेला गरुड, तर त्याच्या मागे खालच्या बाजूला ‘चक्रपुरुष’. देवाच्या उजव्या पायाशी चामरधारिणी, आणि तिच्या मागे खालच्या बाजूला ‘शंखपुरुष’. विष्णूच्या मूर्तीच्यापाशी दोन आयुधपुरुष कोरलेले असणे हे फारच सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण असे शिल्पांकन म्हणावे लागेल. विष्णूची आयुधे मनुष्यरुपात कोरणे याला ‘आयुधपुरुष’ असे म्हणतात. विष्णूच्या पायाशी ‘आयुधपुरुष’ कोरणे ही काही सर्वसामान्य बाब नाही तर खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथल्या विष्णूमूर्तीच्या पायाशी ‘आयुधपुरुष’ कोरलेले आहेत. त्यानंतर अशी मूर्ती ही या तुरवडे इथेच दिसते. आणि म्हणूनच आयुधपुरुषांचे अंकन हे इथले मूर्तीवैभव म्हणावे लागेल. इतक्या आड रानात असलेल्या या ठिकाणी आयुधपुरुषांसह देवाचे दर्शन झाले आणि अवघा रंग एक झाला. इथून हलूच नये असं झालं. कितीही वेळ ते सगळं शिल्पसौंदर्य बघत बसलं तरी तिथून पाय काही निघेना. गर्द झाडीत वसलेलं हे ठिकाण खरंच सर्वांगसुंदर आहे. हिरवा निसर्ग आणि आपण एवढंच.
या विष्णूमंदिराच्या बाजूलाच अजून एक लहान मंदिर आहे. त्यात महिषासुरमर्दिनीची मूर्ती दिसते. आसमंतात एवढी दोनच मंदिरे. कोणी, कधी आणि कुठल्या उद्देशाने बांधली असतील हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मात्र एक लक्षात येते की अजून कितीतरी खजिना कोकणात दडला आहे. तो कधी आणि कसा सापडणार हे देवालाच ठाऊक. तुरवडे इथला जनार्दनविष्णू बघायचा योग श्री. धनंजय चितळे आणि नचिकेत बेहेरे यांच्यामुळे आला. कोकणच्या निसर्गाबरोबर देवानेही त्याची विविध वैशिष्ट्ये उलगडून दाखवली.
देवाक काळजी दुसरं काय !!
लेखक – श्री.आशुतोष बापट