दैत्य गुरु शुक्राचार्य मंदिर
बेट ( कोपरगांव ) हे भृगु ऋषिंचे पुत्र व दैत्यांचे गुरु शुक्राचार्य उर्फ भार्गव यांचे हे कर्मस्थान असून त्यांनी तप व वास्तव्य केलेला हा परिसर आहे. त्यामुळे यास ऐतिहासिक तितकेच पौराणिकही महत्त्व प्राप्त झाले असून त्याची आख्यायिका अशी आहे. समुद्रमंथनातून देवांना अमृत मिळाल्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झाले. त्यामुळे दैत्य कुळांचा नाश हा निश्चित झाला. तो होऊ नये व दैत्य कुळ पुढेही चालू रहावे त्यासाठी दैत्यांनाही अमरत्व प्राप्तीसाठी पर्याय असणे जरुरीचे वाटल्याने दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी शंकराची अति घोर तपश्चर्या करुन गायत्री व महामृत्यूंजया पासून तयार झालेला ” संजीवनी ” मंत्र की , ज्या योगे मृत झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकेल असा मंत्र शंकराकडून प्राप्त करुन घेतला व त्या मंत्राच्या आधारे ते मृत झालेल्या दैत्यांना पुन्हा जिवंत करुन देवांविरुध्द युध्दासाठी संजीवन करत असत. त्यामुळे दैत्यांचा संहार व नाश करणे हे देवांना क्रमप्राप्तच झाले. त्यासाठी देवांनी बृहस्पतीकडे जावून यावर उपाय विचारला असता बृहस्पतीनी देवांना असे सांगितले की, जर हा संजीवनी मंत्र लोप पावला तर या मंत्राचा काहीही प्रभाव चालणार नाही व गेलेले दैत्य पुन्हा जिवंत होऊ शकणार नाहीत. यासाठी शुक्राचार्यांकडून या मंत्राची दिक्षा घेणे अथवा मंत्र लोप करणे या शिवाय पर्याय राहिला नाही म्हणून सर्व देव व बृहस्पती या सर्वानी हा संजीवनी मंत्र हस्तगत करण्यासाठी बृहस्पती पुत्र कच याची नेमणूक केली व त्यास गुरु शुक्राचार्य यांच्याकडे पाठविले. कच जेथे संजीवनी विद्या प्राप्तीसाठी आला ते हे स्थान असून शुक्राचार्य मंदीर हे गुरु शुक्राचार्याचे स्थान आहे. ते पूर्व गोदावरी नदीच्या पश्चिम तीरावर (ऐलतीरावर) होते व कच जेथे गुरु सेवेकरिता आला ते स्थान गोदावरीच्या पैलतीरावर होते. ते स्थान कचेश्वर मंदीर म्हणून प्रसिध्द असून ते शुक्लेश्वर मंदीराच्या उत्तर पूर्व बाजूस असून ते शुक्राचार्य व कचेश्वर यांचे एकत्रित पिंडीच्या स्वरुपात स्थापित आहे. गोदावरीच्या ऐलतीरावर गुरुचे स्थान व पैलतीरावर शिष्याचे स्थान आहे. पूर्वीच्या नदीवरील घाट व त्याच्या खुणा अजूनही मंदीराच्या समोरील श्री विष्णू व गणपती मंदिराजवळ दिसून येतात. त्याच ठिकाणी गुरु शुक्राचार्य यांच्याकडून कच व देवयानी यांना हा ” संजीवनी ” मंत्र मिळविल्याचे संजीवनी पाराचे स्थान असून त्यात मंत्र मिळाल्यानंतर स्वर्गातील देवगण कचेश्वरावर पुष्पवृष्टी करण्यासाठी आले. त्यामुळे इतर देवांच्याही पिंडीच्या स्वरुपात प्रतिकात्मक मूर्ती आपणांस पहावयास मिळतील. हे स्थान अत्यंत जागरुक असून पावणारे आहे, अशी भक्तांची धारणा आहे.
गुरुची सेवा करण्यासाठी सर्व शिष्य कचासह रोज पैल तीरावरुन ऐलतिरावर म्हणजे हल्लीच्या शुक्लेश्वर मंदीराचे स्थानावर नित्यनियमाने येत असत. या शिष्यांना नदीच्या विशाल पात्रातून येण्या -जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून शुक्राचार्यांनी आपल्या हाताचा कोपर मारुन नदीचा प्रवाह बदलला. आज जो गोदावरी नदीचा प्रवाह आपणांस दिसत आहे तो बदलेला प्रवाह आहे. हाताच्या कोपराने नदीचा प्रवाह बदलल्यामुळे या भागास कोपरगांव असे नाव पडल्याची आख्यायिका आहे.
सर्व शिष्यांमध्ये कच हा अत्यंत भक्तिभावाने गुरुची सेवा करत असल्यामुळे सहाजिकच तो सर्व शिष्यांमध्ये गुरुचा लाडका शिष्य होता. ही गोष्ट इतर दानवांना सहन होत नसे. त्यामुळे कचावर दानवांची फार वाईट दृष्टी होती. द्वेषापोटी त्यांनी कचास देान वेळा ठार मारुनही टाकले. गुरु शुक्राचार्याना देवयानी नावाची एकुलती एक कन्या होती. तिचा कचावर जीव जडला होता. त्यामुळे तिने कचास दोन्ही वेळा वडिलांकडून संजीवनी मंत्राद्वारे जिवंत करुन घेतले. परिणामी सर्व दैत्य संतापले व त्यांनी कचाचा संपूर्ण नायनाट करण्याचे ठरविले. पुन्हा तिस-यांदा कचास ठार मारुन त्यांच्या शरीराची राख केली व ती राख आपले गुरु शुक्राचार्य यांना सोमरसातून प्राशन करविली. दैत्यांचे गुरु असल्यामुळे शुक्राचार्य हे सोमरस प्राशन करीत असत. त्याचा गैरफायदा घेवून दैत्यांनी डाव साधला. कच दिसेना म्हणून देवयानीने आपल्या वडिलांकडे कचासाठी पुन्हा हट्ट धरला. यावेळी अंतर्ज्ञानात गुरुंनी पाहिल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की कच हा आपल्याच पोटात आहे. ही गोष्ट त्यांनी आपली लाडकी व एकुलती एक कन्या देवयानी हीस सांगून कचास जिवंत करणे अवघड असल्याचे सांगितले. तरी ही देवयानीने कसेही करुन कचास जिवंत करा हा आग्रह धरल्यामुळे शुक्राचार्यांनी देवयानीस सांगितले की जर कच जिवंत झाल्यास तो माझे पोट फाडून बाहेर येईल व मी मृत पावेल. त्यावर देवयानी हिने आपले वडील शुक्राचार्य यांना असे सुचविले की, आपण मला संजीवनी मंत्र शिकवावा त्या योगे मी तो मंत्र म्हणून आपणांस जिवंत करते. मुलीच्या हट्टाने व मद्य व्यसनामुळे जी गोष्ट घडून गेली, ती गेली गुरु शुक्राचार्यानी हा मंत्र आपली कन्या देवयानीस सांगितला (जपला). तो कचाने शुक्राचार्यांच्या पोटात असतांना ऐकला. कच जिवंत होऊन गुरुंचे पेाट फोडून बाहेर आला. शुक्राचार्य मृत झाले. परंतु देवयानीने संजीवनी मंत्राने पुन्हा त्यांना जिवंत केले. ही घटना जेथे घडली तो संजीवनी पार या घटनेची मंदिरासमोर साक्ष देत आहे. संजीवनी मंत्र हा गुरु शुक्राचार्य, देवयानी व कचदेव यांनी ऐकल्यामुळे तो षट्कर्णी झाला व मंत्राचा लोप झाला. अशा त-हेने या मंत्राचा प्रभाव शिल्लक न राहिल्यामुळे दैत्यांना पुन्हा-पुन्हा जिवंत करण्याची शक्ती शुक्राचार्यांमध्ये राहिली नाही. देवांचे कार्य साध्य झाल्यामुळे मूळ देवलोकी जाण्यास कच निघाला, परंतू आश्रमात आल्यापासून देवयानीचे कचावर प्रेम जडल्यामुळे तिने त्यास लग्नासाठी याचना केली. आपण दोघेही एकाच वडिलाच्या उदरातून बाहेर आल्यामुळे आपले नाते हे गुरुबंधू व गुरु भगिनींचे झाल्यामुळे मी तुला वरु शकत नाही, असे सांगितले. या गोष्टीचा राग येवून व अपेक्षाभंगाच्या दुःखामुळे देवयानीने कचास शाप दिला की, तू जी विद्या प्राप्त करुन चाललास त्या विद्येचा तुला व कोणासही कधीही उपयोग होणार नाही, देवयानीची शापवाणी ऐकून कचानेही देवयानीस शाप दिला की, तू ब्राम्हण कन्या असूनही तुझा विवाह ब्राम्हण पुत्राशी होणार नाही. पुढे ही शापवाणी खरी ठरुन देवयानी हिचा विवाह क्षात्रकुळातील ” ययाती ” राजाशी झाला. अशी ही पौराणिक कथा आहे.
आजही शुक्राचार्यांचे हे स्थान त्यांच्या तपोबलाने पुनीत झाल्यामुळे या भूमीवर जी-जी विवाह कार्ये होतात. त्यासाठी मुहूर्त, वेळ, नक्षत्र, तिथी यांचा कोणताही दोष लागत नाही. येथे केव्हाही विवाह होतात. (कोपरगांवचे माजी खासदार कै. मा. शंकररावजी काळे साहेब व अनेक मान्यवरांचे विवाहसुध्दा याच मंदिरात झाले आहे )
या सर्व गोष्टींची साक्ष हा परिसर देत असून देवळाच्या ओव-या पूर्वी येथे असलेल्या पेशव्यांच्या वाडयाच्या अवशेषातून बांधलेल्या आहेत. तसेच समोर श्री विष्णू व गणपती यांची मंदिरे आहेत. श्री विष्णुचे मंदिर हे काळया गुळगुळीत दगडातून बांधलेले असून मंदिराच्या पायथ्याशी पूर्वी नदीचा घाट होता. त्याच्या खुणा व शिलालेख आजही बघावयास मिळतो. तसेच दोन्ही मंदिराच्या मध्यात ” संजीवनी पार ” म्हणजे येथे कचास ” संजीवनी ” विद्या प्राप्त झाली व कच आणि देवयानी यांनी एकमेकांस शापित केले. त्याचे हे स्थान असून याचे उत्तर पूर्वेस शुक्राचार्य शिष्य कचदेव यांचे गुरुसह मंदिर व ओव-या ( कचेश्वर मंदिर) असून त्या स्थळी संजीवनी मंत्र देते वेळी श्री शंकर भगवान (त्र्यंबकेश्वर) गुप्त रुपाने तेथे आल्यामुळे त्यांचेही श्री त्रिंबकेश्वर मंदिर आहे. श्री शंकर भगवान येथे गुप्त रुपाने आल्यामुळे सदर मंदिरासमोर नंदीची स्थापना झालेली नाही. कचेश्वर मंदिरात सेवा ( प्रदक्षिणा) घालण्याचा रिवाज आहे.