बिजीनाथ महादेव आणि अष्टदिक्पाल
तारापूर, पंढरपूर, सोलापूर
संकलन – सुधीर लिमये पेण
चंद्रभागेच्या तीरावर पंढरीपासून फक्त १७ कि.मी. वर असलेल्या तारापूर या गावी जसे ब्रह्मदेव अकस्मात भेटले तसेच या गावात अजून एक नवल दडलेले होते. एक प्राचीन शिवालय. बिजीनाथ महादेव. उसाच्या शेतातून जाणारा रस्ता, आणि अगदी नदीच्या काठावर एक छोट्याशा उंचवट्यावर वसलेले देऊळ. देवळाची डागडुजी चाललेली. काम करणारांची लगबग. आता शिवरात्र जवळ आली, त्याच्या आत देवळाबाहेरची फरशी घालून व्हायला हवी. देऊळ तसं छोटेखानी. सभामंडप, अंतराळ आणि गाभारा असं सुटसुटीत काम. सभामंडपात नंदी आणि गाभाऱ्यात सुरेख शिवलिंग आहे. मंदिरावर बाकी मूर्तिकाम काही नाही. आजूबाजूला काही अवशेष पडलेत. मंदिर यादवकालीन वाटत होतं.
देवळात आत गेल्यावर छताकडे नजर गेली. इथे आठ कोनात अष्टदिक्पाल त्यांच्या पत्नींसह आपापल्या वाहनांवर विराजमान झालेले आहेत. अप्रतिम काम. खिरेश्वरच्या मंदिरात असे दिसतात. पण ते एकाच शिळेवर आहेत. इथे प्रत्येक दिक्पाल त्या त्या दिशेनुसार बसलेला. देवळाच्या पुजाऱ्यांना आणि तिथल्या एका महंतांना या बद्दल विचारलं. त्यांना काही माहिती नव्हतं’. दिक्पाल म्हणजे प्रत्येक दिशेचा स्वामी. मग त्यांना दिक्पाल त्यांच्या दिशा आणि वाहने हे कागदावर लिहून दिलं. मंडळी एकदम खुश झाली. मंदिर बटबटीत रंगाने रंगवलेलं. ते पण चांगलं नाही असं सांगितलं. आश्चर्य म्हणजे चक्क त्यांना ते पटलं. सुदैवाने ऑइल पेंट नव्हता. हा रंग गेला की परत रंग नाही लावणार म्हणाले.
तिथे अजून एक सत्कृत्य घडलं. मंदिराबाहेर ४ वीरगळ आहेत. गावकरी त्यांना नदीत विसर्जन करायच्या तयारीत होते. वीरगळ म्हणजे काय आणि ते त्यांच्याच आजा-पणजांचे स्मारक आहे हे सांगितल्यावर मंडळी खजील झाली. काहीच माहिती नसल्यामुळे ते विसर्जन होणार होते. फरशी झाली की सगळे दगड उभे करून देवळात बाजूला मांडून ठेवतो म्हणाले. गावकऱ्यांनी खूप आग्रहाने शेजारच्या वस्तीवर चहाला नेलं. चहा येईपर्यंत शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा समोर आल्या. गावकऱ्यांशी गप्पा रंगल्या. अष्टदिक्पालांची त्यांना नवीनच ओळख झाली होती. जेवणाचा आग्रह टाळून परत पुण्याकडे निघालो. फार वेगळं आणि सुंदर ठिकाण आज बघितलं. आधी ब्रह्मदेव आणि नंतर अष्टदिक्पाल. आणि वीरगळ विसर्जन होण्यापासून वाचले. इतके सुंदर अष्टदिक्पाल फारसे दिसत नाहीत म्हणून याचं कौतुक जास्त. दिवस सार्थकी लागला. देवाक काळजी दुसरं काय..!!
लेखक – श्री. आशुतोष बापट