१८५७च्या युद्धातील बिजली,राणी लक्ष्मीबाई
१८५७च्या युद्धातील काही तेजस्वी तारे म्हणजे नानासाहेब पेशवे,त्यांचा पुतण्या रावसाहेब,तात्या टोपे,कुंवरसिंह,बहादुरशाह जफर इ. या सगळ्यांमध्ये आपल्या दैदिप्यमान कर्तुत्वाने चमकणारी विदुल्लता म्हणजे राणी लक्ष्मीबाई नेवाळकर .
एखाद्या व्यक्तीवर नियती किती अन्याय करू शकते याचे उदाहरण म्हणजे राणी लक्ष्मीबाई . त्यांचे नाव मनकर्णिका. लाडाने त्यांना मनु म्हणत.मनु ३-४ वर्षांची असतानाच तिच्यावर मातृवियोगाचे दु:ख कोसळले.ती केवळ सात वर्षांची असताना तिचा विवाह झाशी संस्थानचे अधिपती गंगाधरपंत नेवाळकरांशी झाला आणि तांब्यांची मनु झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखली जाऊ लागली. पुढे यथावकाश तिला एक मुलगा झाला. पण तो तीन महिन्यांचा असतानाच निवर्तला.त्यामुळे राणीला आणि गंगाधरपंताना पुत्र वियोगाचे दु:ख सोसावे लागले. पुढे गंगाधरपंतांच्याच कुळातील एका मुलास त्यांनी दत्तक घेतले. हा दत्तक विधी समारंभ काही इंग्रज अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधिवत करण्यात आला.तरी पुढे इंग्रजांनी तो नामंजूर करून झाशीचे राज्य खालसा केले.या दरम्यान गंगाधरपंतांचे आजारपणामुळे निधन होऊन वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी लक्ष्मीबाईना वैधव्य प्राप्त झाले. अशा सगळ्या परिस्थितीत एखादी सामान्य स्री असती तर ती खचली असती, निराश झाली असती.पण लक्ष्मीबाईनी निराश न होता परिस्थितीला धैर्याने तोंड दिले.
राणीचा प्रभाव आपल्या प्रजाजनांवर जबरदस्त होता.तिने अनेक प्रजेच्या हिताची कामे करून राज्याची आर्थिक घडीही नीट बसवली होती. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करता याव्यात यासाठी प्रयत्न केले.स्वतः झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले.आणि आपल्या मराठी भाषिकांना अभिमान वाटावा असे तिचे प्रसिद्ध वक्तव्य मेरी झांसी नाही दुंगी हे मराठीतच केले.अशी ही तेजस्वी मराठी कन्या. इंग्रजांना तिचा प्रजेच्या मनावरील प्रभाव नष्ट करायचा होता म्हणून त्यांनी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यास प्रारंभ केला.पण राणीचे उज्ज्वल चारित्र्य माहिती असलेल्या मेजर माल्कम नावाच्या विद्वानाने परस्पर या आरोपाचे जोरदार खंडन केले. त्याने गव्हर्नर जनरलला पत्र लिहून राणीचे चारित्र्य किती उच्च दर्जाचे आहे आणि प्रजेच्या मनात तिच्याविषयी किती आदर आहे हे कळवले.
ब्रिटिशानी दत्तक वारस नामंजूर करून झाशीचे राज्य खालसा केल्यावर राणीला दरमहा ५००० रुपये पेन्शन देऊ केली.पण स्वाभिमानी राणीला ही भिक नको होती.तिने म्हंटले मी माझी झाशी नाही देणार.मला माझ्या प्रजाजानांसाठी,गोरगरीब जनतेसाठी झाशीचे राज्य हवे आहे.पुढे राणीने पराक्रमाने इंग्रंजाच्या हातून झाशी जिंकून घेतले आणि झाशीचा कारभार पाहू लागली.तिच्यावर पुन्हा सर ह्यु रोज या इंग्रज सेनापतीने प्रचंड सेनेसह आक्रमण केले. पण राणीने त्याच्याशी जबरदस्त युद्ध करून त्याला आणि त्याच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले.सात दिवस आणि सात रात्र राणी मोठ्या शर्थीने लढली.इंग्रजांनी तोफांच्या सहाय्य्याने किल्ल्याला पडलेले भगदाड राणीच्या महिला फौजेने रातोरात बुजवले.शेवटी इंग्रज सेनापतीला फितूरीचा आश्रय घ्यावा लागला . किल्ल्याच्या एका दरवाजातून इंग्रज सैन्याने प्रवेश मिळवला.राज्यात प्रजेची लूट करण्यास सुरुवात केली.हे सगळे पाहून राणीला खूप दु:ख झाले. आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिने काल्पीला जाण्याचा निर्णय घेतला.
निवडक सरदारांसह राणी किल्ल्यातून निसटली.एकाच दिवसात १०८ मैलांची घोडदौड करून राणी काल्पीला पोहचली. पुन्हा इंग्रज सेनापती सर ह्यु रोज काल्पीवर चालून गेला.घनघोर युद्ध झाले.राणीने अतुलनीय पराक्रम गाजवला पण हवी तशी मदत न मिळाल्यामुळे माघार घ्यावी लागली आणि काल्पी इंग्रंजांच्या हाती पडले.तेथून पुढे राणी ग्वाल्हेरला गेली.ग्वाल्हेरच्या इंग्रज धार्जिण्या शिंद्यांचा पराभव करून ग्वाल्हेर जिंकून पेशव्यांच्या हाती दिले.पुन्हा थोड्याच दिवसात सर ह्यु रोज ग्वाल्हेरवर चालून आला.याही वेळेला राणीने इंग्रजांचा जबरदस्त प्रतिकार केला.तिचे शौर्य पाहून इंग्रज सैन्य सुद्धा चकित झाले आणि तिला चारही बाजूनी घेरण्यात आले. या वेळी राणीने शरणागती न पत्करता शत्रूची फळी फोडून बाहेर जाण्याचे ठरवले.आता तिच्याजवळ केवळ १५-१६ च घोडेस्वार उरले होते.पण त्या रणरागीणीने अशा काही त्वेषाने आपली तलवार चालवली की समोर येईल त्या गोऱ्या सैनिकाला कापून काढले आणि शत्रूची फळी फोडून निसटण्यात यशस्वी ठरली.वाटेत एक ओढा आडवा आला.राणीजवळ तिचा नेहमीचा राजरत्न घोडा नसल्याने हा नवीन घोडा ओढ्याभोवतीच फिरू लागला.अशातच पाठलागावर असलेल्या इंग्रज सैन्याने
राणीला गाठले आणि या विरांगनेवर वार केले.
राणी रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. ती पुरुषी वेशात असल्यामुळे इंग्रज सैन्य तिला ओळखू शकले नाही. एका सेवकाने त्यांना मठात आणले आणि त्यांच्या मुखात गंगोदक घातले.आपला देह क्रूर इंग्रंजाच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी त्याठिकाणी वीर मरण पत्करले.
वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी वीर मरण पत्करणाऱ्या झाशीच्या राणीचे चरित्र प्रेरणादायी आहे. राणीच्या या बलिदानाने स्वा.सावरकरांपासून जगभर पसरलेल्या क्रांतीकारकाना, सरदार भगतसिंग यांच्या संघटनेला आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेला स्फूर्ती दिली.अनेक पिढ्यांना स्फूर्ती दिली आणि देत राहील. मला राणीच्या आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासात काही साम्य स्थळे आढळली.ती म्हणजे शिवाजी महाराजांनी जसे एकनिष्ठ मावळे जमवले होते तशी एकनिष्ठ महिला फौज राणीने जमवली.जसे महाराजांचे जीवाला जीव देणारे साथीदार होते तशाच राणीच्या काही एकनिष्ठ दासी होत्या.शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून निसटले तेव्हा त्यांची जागा त्यांच्या जीवा या त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या सेवकाने घेतली आणि आपल्या प्राणांचे बलिदान देऊन महाराजांचे प्राण वाचवले.तशीच लक्ष्मीबाईची तिच्यासारखीच दिसणारी कशी म्हणून एक दासी होती.राणी जेव्हा झाशीच्या किल्ल्यावरून निसटली तेव्हा या काशीने राणीच्या रुपात घोड्यावर स्वार होऊन इंग्रज सैन्याची दिशाभूल केली म्हणून राणीला काल्पीला पोहचता आले.पुढे ही काशी सुद्धा इंग्रजां झुकांडी देऊन राणीच्या मदतीला काल्पीला पोहचली हे विशेष.
अशा वीरांगना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या चरणी शतशः प्रणाम. कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितेतील दोन ओळी या ठिकाणी देऊन हा लेख संपवतो.
रे हिंदबांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन धाळी
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशीवाली
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )