श्रीरामवरदायिनी देवी, पारसोंड, जि. सातारा
संकलन – सुधीर लिमये पेण
श्री क्षेत्र पार्वतीपूर (पार) हे गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वराच्या पश्चिमेस रडतुंडीच्या घाटापासून सहा मैल अंतरावर आहे. गाव प्रतापगडाच्या दक्षिणेला पायथ्याशी वसलेले आहे. महाबळेश्वर – पार या रस्त्याने ते महबळेश्वरपासून २० मैलावर येते. छत्रपती शिवाजीराजे यांच्या काळापूर्वी पासून आहे. चंद्रराव मोरे घराण्याने पहिले मंदिर बांधले.
पार्वतीपूर (पार) ही एक बाजारपेठ होती. सातारा- वाई-मेढा त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील महाड, पोलदपूर इत्यादी ठिकाणाहून व्यापारी लोक पारला येऊन मोठा बाजार भरवीत असत. या व्यापारी पेठेचे विभाजन करून पारपार, पेठपार व सोंडपार अशी तीन गावे निर्माण केली व त्यांसाठी वेगवेगळी मुलकी व पोलीस पाटलांची व्यवस्था केली.
श्री आदिशक्ती श्रीरामवरदायिनी हे महाराष्ट्रातील एक जागॄत शक्तीपीठ आहे. ही महाराष्ट्रातील सर्व हिंदू – मराठा सरदार, कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशैव समाज या सर्वांची कुलदेवता आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनावर दोन मूर्ती आहेत. डाव्या बाजूस असलेली अडीच फूट उंचीची मूर्ती “श्री वरदायिनी” या नावाने आणिउजव्या बाजूची तीन फूट उंचीची मूर्ती “श्रीरामवरदायिनी” या नावाने ओळखली जाते.
प्रभु श्रीरामचंद्रांना वर देणारी अशी आख्यायिका याच देवीबाबत सांगितली जाते. अर्थात रामवरदायिनीची स्थापना प्रभु रामचंद्रांनी केली अशी श्रीरामवरदायिनीची आख्यायिका एकनाथ महाराजांनी आपल्या भावार्थ रामायणातील अरण्यकांड या भागात आणि पुढे श्रीधरस्वामींनी आपल्या रामविजय ग्रंथात कथन केली आहे.
सध्याच्या या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शिवाजी महाराजांनी केली असली, तरी त्यापूर्वीच्या पुरातन काळामध्ये खुद्द ब्रम्हा‚ विष्णू आणि महेश यांनी या वरदायिनी देवीची स्थापना केली आहे अशी आख्यायिका सांगितली जाते.
स्रोत: आंतरजाल, विकिपीडिया.