श्री. दत्त मंदिर, भटवाडी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

श्री. दत्त मंदिर, भटवाडी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी अर्थात श्री थोरले स्वामी महाराज हे मूळचे कोकणातील माणगावचे. सावंतवाडीतल्या भटवाडीत श्री विठ्ठलशास्त्री अळवणी हे विद्वान पंडित रहात होते. त्यांना दोन मुलं होती – श्री विष्णूशास्त्री आणि श्री कृष्णाजी अळवणी. हे अळवणी पिता-पुत्र सावंतवाडीतील सरकारी श्री विठ्ठल मंदिराचे पुजारी होते. श्री थोरले स्वामी महाराज अनेकदा सावंतवाडीला या अळवणींकडे ज्योतिष व धर्मशास्त्रीय चर्चेसाठी जात असत. अळवणी कुटुंबाशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते.

या अळवणी कुटुंबात संमंधिक बाधा होती. तिच्या परिहारार्थ अळवणी कुटुंब श्री मारुतीची स्थापना करण्याच्या विचारात होते. परंतु, श्री थोरल्या स्वामी महाराजांनी त्यांना श्री गुरु दत्तात्रेयांची स्थापना करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे श्री अळवणी सारवट गाडी घेऊन श्री क्षेत्र गाणगापूर येथे गेले आणि तिथून अखंड काळ्या पाषाणातील श्री दत्त मूर्ती घेऊन सावंतवाडीत परतले आणि भटवाडीतील श्री विठ्ठल मंदिराच्याच शेजारी इसवी सन १८८०-८१ च्या दरम्यान श्री दत्त मंदिराची उभारणी करुन तिथे या मूर्तीची स्थापना केली. श्री थोरल्या स्वामी महाराजांनी माणगांव येथील श्री दत्त मंदिराची स्थापना सन १८८२ मध्ये केली. त्याआधी या मंदिराची स्थापना झाल्याने थोरले स्वामी महाराजांनी स्थापन केलेलं भारतातील हे पहिलं दत्त मंदिर होय असं सांगण्यात येतं.

पुढे श्री थोरल्या स्वामी महाराजांनी सन १८८९ मध्ये श्री दत्त महाराजांच्या आज्ञेनुसार माणगाव सोडले. त्यानंतर ते परत कधीही माणगांवला आले नाहीत. माणगाव व कोकण प्रांत सोडून जाताना इ. स. १८८९ पौष शुध्द पंचमी या तिथीला (दिनांक ६ जानेवारी, १८८९) त्यांनी या भटवाडी दत्त मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या श्री औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु दत्तात्रेयांच्या शिला पादुका आपली आठवण म्हणून स्थापन केल्या.

या मंदिरातील श्री दत्त मूर्ती ही तीन मुखे सहा हात असलेली आहे आणि विष्णुप्रधान आहे. माला कमंडलू, शंख चक्र आणि गदा पद्म ही आयुधे धारण केलेली अशी ही मूर्ती आहे. तसंच मूर्तीसमोर बाणलिंगाची स्थापना सुध्दा करण्यात आलेली आहे. आम्हाला या मंदिराबद्दलची माहिती देणारे श्री नंदकिशोर अळवणी यांनी काळ्या पाषाणातील मूर्तींचे एक वैशिष्ट्य सांगितलं ते असं की काळ्या पाषाणातून तयार केलेल्या मूर्तीवर आपण जे जे संस्कार, मंत्रोपचार करतो ते सगळे त्या मूर्तीत साठवले जातात आणि कालांतराने उपासक, भक्त यांच्यात उत्सर्जित होतात. पावडरयुक्त संगमरवरी मूर्तींच्या बाबतीत हे शक्य नसतं.

इ. स. १९५५ मध्ये या मंदिराचा जिर्णोध्दार झाला. या मंदिरात श्री दत्त जयंती, पौष शुध्द पंचमी, गुरुद्वादशी, गुरुप्रतिपदा आणि राखी पोर्णीमेचा उत्सव असतो.

तर असं हे भटवाडीचं श्री दत्त मंदिर. या मंदिराशेजारीच श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सुध्दा आहे. तिथे श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री थोरले स्वामी महाराज यांच्याही सुंदर मूर्ती आहेत. परमपुज्य श्री थोरले स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे स्थान आवर्जून भेट द्यावं असंच आहे.